पाठांतर?
Such an old-school way of learning!
काही दिवसांपूर्वी ऑफिसमध्ये काही तरुण सहकाऱ्यांसोबत गप्पा मारत बसलो होतो. विषय निघाला शाळेच्या आठवणींचा. कुणीतरी जुन्या कविता, पाठांतराच्या स्पर्धा आणि शाळेतल्या मराठीच्या तासांचा उल्लेख केला. सहज म्हणून मी लहानपणी शिकलेली एक कविता म्हणून दाखवली. कविता संपली तेव्हा मला वाटले, गप्पा पुढे सरकतील. पण तसे झाले नाही. माझ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यांवर आश्चर्य होते.
“तुम्हाला अजूनही पूर्ण कविता आठवते?”
प्रश्न साधा होता, पण त्यामागे एका पिढीचे अंतर दडलेले होते.
मी क्षणभर विचारात पडलो. कारण माझ्यासाठी त्या कवितेचे स्मरण काही विशेष नव्हते. आमच्या पिढीतील अनेकांना शाळेत शिकलेल्या कविता, अभंग, आरत्या, पाढे किंवा देशभक्तीपर गीते अजूनही आठवतात. त्याहीपेक्षा माझ्या आई-वडिलांच्या आणि आजी-आजोबांच्या पिढीकडे तर याहून कितीतरी मोठा साठा होता. त्यांना शेकडो म्हणी, सुभाषिते, अभंग, ओव्या, स्तोत्रे सहज तोंडपाठ असत. त्यात त्यांना काही विलक्षण वाटत नसे. हे सगळेच त्यांच्या जगण्याचा एक भाग होते. मात्र त्या दिवशी माझ्या सहकाऱ्यांच्या आश्चर्यामुळे मला एका गोष्टीची जाणीव झाली. मी आणि ते यांच्यामध्ये केवळ वयाचे अंतर नव्हते तर स्मरणशक्तीबरोबर असलेल्या नात्याचेही अंतर होते. माझ्या बालपणी कविता पाठ करणे ही सामान्य गोष्ट होती. त्यांच्या पिढीसाठी मात्र तीस-चाळीस वर्षांपूर्वी शिकलेल्या ओळी अजूनही लक्षात असणे ही जवळजवळ जादू होती. घरी परतल्यावर मी बराच वेळ या विचारात होतो. आणि हळूहळू लक्षात आले की हा प्रश्न एका कवितेचा नाही. हा प्रश्न आपल्या संस्कृतीचे आणि स्मरणशक्तीचे नाते कसे बदलले याचा आहे.
मानवी इतिहासाच्या बहुतांश काळात ज्ञानाचा मुख्य स्रोत पुस्तके नव्हती. ती मानवी स्मरणशक्ती होती. आज हे वाक्य अतिशयोक्ती वाटू शकते, कारण आपल्यासाठी ज्ञान म्हणजे ग्रंथालये, पुस्तकांची कपाटे, संगणक, फोन, सर्व्हर, एआय आणि क्लाउड. पण हजारो वर्षे माणसांनी आपली संस्कृती कागदावर नव्हे तर स्मरणात वाहून नेली. कथा, कविता, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, लोकपरंपरा, म्हणी, गीते आणि जीवनज्ञान हे सर्व एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्मरणाच्या अदृश्य धाग्यांनी पोहोचत असे.
भारतात तर या परंपरेने अभूतपूर्व उंची गाठली होती. वेदांची परंपरा हा त्याचा सर्वात भव्य पुरावा आहे. हजारो वर्षे वेद लिहिले गेले नव्हते. गुरु शिष्याला शिकवत होता, शिष्य पुढच्या पिढीला. केवळ शब्दच नव्हे, तर त्यांचे स्वर, उच्चार, लय आणि विरामही तितक्याच अचूकतेने पुढे जात होते. जगात अनेक संस्कृतींनी ग्रंथ निर्माण केले पण संपूर्ण ग्रंथसंपदा मानवी स्मरणावर शतकानुशतके टिकवून ठेवण्याचे धाडस भारतासारख्या फार थोड्या संस्कृतींनी केले. ही गोष्ट फक्त वेदांपुरती मर्यादित नव्हती. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वरांची ओवी, तुकारामांचे अभंग, नामदेवांची रचना, रामदासांचे मनाचे श्लोक, कीर्तनांची परंपरा, भारुडे, पोवाडे आणि लोकगीते ही सर्व स्मरणाच्या बळावरच पिढ्यान्पिढ्या जिवंत राहिली. बहुसंख्य लोक निरक्षर असलेल्या काळात आपल्या या संस्कृतीचे जतन पुस्तकांनी केले नाही तर लोकांनी केले. एखाद्या वारकऱ्याला शेकडो अभंग पाठ असत. एखाद्या कीर्तनकाराला हजारो ओळी तोंडपाठ असत. त्या शब्दांनी केवळ धर्म जिवंत ठेवला नाही तर त्यांनी भाषा, संस्कृती आणि सामूहिक स्मृतीही जिवंत ठेवली.
अशा स्मरणसंस्कृतीतूनच काही विलक्षण व्यक्तिमत्त्वे घडली. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कैद असलेल्या विनायक दामोदर सावरकरांकडे ना कागद होता, ना लेखणी. पण विचारांना कैद करणे शक्य नसते. त्यांनी कविता मनात रचल्या, त्या पाठ केल्या आणि इतर कैद्यांना शिकवल्या. त्या ओळी एका स्मरणातून दुसऱ्या स्मरणात प्रवास करत राहिल्या. कैदी सुटून बाहेर पडले तसे कविता देखील बाहेर पडल्या. मानवी स्मरणशक्तीच त्यांची वही बनली आणि मानवी मनच त्यांचा छापखाना.
लोकमान्य टिळकांची कथा वेगळी असली तरी त्याच सत्याकडे निर्देश करते. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य लिहिले. त्यांच्या आजूबाजूला कितीतरी पुस्तके होती reference साठी पण त्यापेक्षा त्यांच्या मनात किती पुस्तके जिवंत होती हे अधिक महत्त्वाचे होते. गीता, उपनिषदे, वेदान्त, संस्कृत साहित्य आणि भारतीय तत्त्वज्ञान यांचा दशकेभराचा अभ्यास त्यांच्या स्मरणात साठलेला होता. तुरुंगाने त्यांच्या शरीराला मर्यादा घातल्या, पण त्यांच्या अंतर्गत ग्रंथालयाला नाही.
प्राचीन ग्रीसमधील rhapsodes नावाचे कवी आणि कथाकार Iliad आणि Odyssey सारखी महाकाव्ये आपल्या स्मरणात वाहून नेत असत. ही महाकाव्ये लिहून ठेवली जाण्याच्या अनेक शतकांपूर्वी ती लोकांच्या जिभेवर आणि मनात जिवंत होती. हे काही केवळ कवींचे काम नव्हते. स्मरणशक्ती ही साक्षरतेचा एक नैसर्गिक भाग होती. वाचता येणे आणि पाठ करता येणे या दोन वेगळ्या गोष्टी नव्हत्या. मानसशास्त्रज्ञ Mihaly Csikszentmihalyi यांनी एक निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या मते मानवी मनाची मूळ अवस्था शांतता नसून गोंधळ आहे. मनाला काहीही काम नसेल तर ते काळजी, चिंता, आठवणी, भीती आणि असंख्य अपूर्ण विचारांनी भरून जाते. आजच्या काळात हे निरीक्षण अधिकच खरे वाटते. थोडाही रिकामा वेळ मिळाला की आपण फोन हातात घेतो. काही सेकंदांचा विरामही अस्वस्थ करू लागतो. पण पूर्वीच्या पिढ्यांकडे अशा क्षणांसाठी काही वेगळे होते. त्यांच्या स्मरणात कविता होत्या, श्लोक होते, अभंग होते. मन भटकू लागले की ते या शब्दांकडे परत येऊ शकत होते. स्मरणात असलेली कविता ही केवळ साहित्य नव्हती, ती मनाला दिशा देणारे एक साधन होती.
म्हणूनच इतिहासात संकटाच्या काळात स्मरणशक्तीचे महत्त्व वारंवार दिसून येते. रशियातील Anna Akhmatova यांनी आपल्या प्रक्षोभक कविता लिहून ठेवण्याचा धोका पत्करला नाही. त्यांनी त्या विश्वासू मित्रांना पाठ करून दिल्या. कवी Osip Mandelstam यांचा मृत्यू श्रमछावणीत झाला. पण त्यांची पत्नी Nadezhda हिने त्यांच्या कविता दररोज मनात पुन्हा पुन्हा म्हणत पुढची तीस वर्षे जपून ठेवल्या. एका स्त्रीच्या स्मरणशक्तीने संपूर्ण साहित्यिक वारसा वाचवला. Eva Zeisel या हुकूमशाही राजवटीच्या तुरुंगात एकट्या कैदेत होत्या. कोणालाही एकटेपणामुळे वेड लागेल अश्या परिस्थितीतही टिकून राहण्यासाठी त्यांनी स्वतःच्या कविता रचल्या आणि त्या पाठ केल्या. त्या कविताच पुढे त्यांच्या अस्तित्वाच्या साक्षीदार ठरल्या.
साधारणपणे १९२० पूर्वी जन्मलेल्या प्रत्येक सुशिक्षित इंग्रज व्यक्तीच्या स्मरणात Shakespeare, Milton किंवा Tennyson यांच्या कवितांचे मोठे भाग जिवंत असत. त्यांची शाळा थ्यान्च्याकडून तशी अपेक्षा करत असे आणि विद्यार्थी ते स्वाभाविकपणे आत्मसात करत. परंतु १९६० आणि ७० च्या दशकात शिक्षणाविषयीची दृष्टी बदलली. पाठांतराला सर्जनशीलतेच्या विरोधात असलेले, केवळ यांत्रिक आणि रटाळ शिक्षण मानले जाऊ लागले. आणि काही दशकांतच शतकानुशतके चालत आलेली स्मरणसंस्कृती बहुतेक अभ्यासक्रमांतून मागे सरकली.
स्मरण ही केवळ माहिती साठवण्याची पद्धत नाही, हेच अशा कथा सांगतात. ती स्वातंत्र्याची एक पद्धत आहे. कारण जे तुमच्या आत आहे ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, ते फक्त तुमचे असते, कायम.
एखादी कविता पाठ करणे म्हणजे फक्त ओळी लक्षात ठेवणे नव्हे. ती मनात साठवण्याची एक प्रक्रिया असते. कविता वाचून संपत नाही. दिवसातून अनेकदा तिची एखादी ओळ आठवते. एखाद्या शब्दाचा अर्थ नव्याने उलगडतो. आयुष्यातील एखादा अनुभव त्या कवितेला वेगळा अर्थ देतो. हळूहळू कविता पुस्तकातून बाहेर पडते आणि तुमच्या आयुष्याचा भाग बनते. म्हणूनच वीसाव्या वर्षी पाठ केलेली कविता साठाव्या वर्षी तशीच राहत नाही. कविता तीच असते, पण तिच्याकडे पाहणारा माणूस बदललेला असतो.
यामुळे स्मरणशक्तीचे आणखी एक महत्त्वाचे कार्य समोर येते. ती केवळ ज्ञान साठवत नाह तर ती चिंतन घडवते. एखादी गोष्ट मनात राहिली की ती आपल्यावर काम करत राहते. कवितेचं पुस्तक बंद झाल्यानंतर तिचा खरा प्रवास सुरू होतो. आज आपण एखादा लेख वाचतो, व्हिडिओ पाहतो किंवा माहिती शोधतो. काही मिनिटांनी पुढच्या गोष्टीकडे वळतो. माहिती मिळते, पण ती आपल्यात रुजत नाही. कारण तिच्यासोबत बराच काळ राहण्याची संधीच आपल्याला मिळत नाही.
कदाचित याच गोष्टीत गेल्या काही दशकांतील मोठा बदल दिसतो. पूर्वी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला जात असे. आता ती कुठे सापडेल हे लक्षात ठेवणे पुरेसे मानले जाते. पूर्वी फोन नंबर स्मरणात असत, आता ते फोनमध्ये असतात. पूर्वी कविता मनात असायच्या, आता त्या बुकमार्कमध्ये असतात. पूर्वी घरातील ज्येष्ठ व्यक्ती हे चालतेबोलते संदर्भग्रंथ असत, आता search engine किंवा AI ती भूमिका निभावतात. या बदलामुळे आपण खूप काही मिळवले आहे. ज्ञान अधिक उपलब्ध झाले आहे. शिक्षण अधिक लोकशाहीवादी झाले आहे. माहिती मिळवण्यासाठी आयुष्य खर्च करावे लागत नाही. पण प्रत्येक प्रगतीसोबत काही न दिसणारे नुकसानही होत असते. स्मरणाची जबाबदारी बाह्य साधनांवर सोपवल्यावर आपण नकळत मनाचे काही स्नायू वापरणे कमी केले. दीर्घकाळ लक्ष केंद्रित ठेवण्याची क्षमता कमी झाली. एखाद्या विचारासोबत आठवडे किंवा महिने राहण्याची सवय कमी झाली. लांब निबंध, प्रदीर्घ कविता किंवा गुंतागुंतीचे तर्क संयमाने ऐकण्याची क्षमता कमी झाली. आपण माहितीच्या विस्तारात श्रीमंत झालो, पण अंतरीकरणाच्या खोलीत काहीसे गरीब झालो. म्हणूनच कधी कधी असे वाटते की स्मरणशक्तीचा ऱ्हास हा फक्त स्मरणशक्तीचा ऱ्हास नाही. तो चिंतनाचा ऱ्हास आहे. तो अंतर्मनाशी संवाद साधण्याच्या क्षमतेचा ऱ्हास आहे.
कदाचित म्हणूनच त्या दिवशी माझ्या सहकाऱ्यांना माझी कविता आठवणे एवढे आश्चर्यकारक वाटले. त्यांना कवितेपेक्षा स्मरणाचेच आश्चर्य वाटत होते.
माझ्या आजी-आजोबांच्या पिढीला शेकडो कविता आणि अभंग तोंडपाठ होते. माझ्या पिढीला त्यांपैकी काही कविता अजूनही आठवतात. पुढच्या पिढीला त्या कुठे शोधायच्या हे माहीत आहे. आणि कदाचित त्यानंतरच्या पिढीला एवढेच माहीत असेल की अशा काही गोष्टी कधीतरी अस्तित्वात होत्या.
हा केवळ पाठांतराचा प्रश्न नाही. हा स्मरणशक्ती आणि संस्कृती यांच्यातील नात्याचा प्रश्न आहे.
कारण पुस्तकांच्या कपाटात ठेवलेली कविता ही साहित्य असते. पण स्मरणात जपलेली कविता ही संस्कृती असते. आणि आयुष्याच्या कठीण वळणांवर, जेव्हा माणूस स्वतःशी एकटा उरतो, तेव्हा अनेकदा हीच संस्कृती त्याचा सर्वात विश्वासू सहप्रवासी ठरते.
-- विश्वेश


