गिळलेले शब्द
लहानपणी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मित्र म्हणायचे च्युइंगम गिळू नकोस, ते सात वर्षं पोटात राहील. आई म्हणायची कलिंगडाचं बी चुकून पोटात गेलं तर आत झाड उगवेल. आजी म्हणायची अंधारात शिट्टी मारू नको, रात्री नखं कापू नको, ग्रहणाच्या वेळी बाहेर जाऊ नको… अशा कितीतरी समजुती आपण प्रश्न न विचारताच स्वीकारतो. त्या खऱ्या आहेत की खोट्या, याचा विचार करण्याइतकं शहाणपण तेव्हा आपल्यात नसतं. बालपण हे विश्वासाचं वय असतं, तर्काचं नाही.
मोठं झाल्यावर मात्र हळूहळू कळतं की त्या सगळ्या भीती निरागस होत्या. च्युइंगम शरीर पचवून किंवा तसेंच बाहेर टाकतं, कलिंगडाच्या बियापासून पोटात काही झाडबीड उगवत नाही आणि अंधार हा फक्त प्रकाश नसण्याची एक स्तिथी. बालपणाने ज्या भीती आपल्या मनात ठेवल्या होत्या, त्या काळ हळूहळू पुसून टाकतो.
पण मोठं झाल्यावर लक्षात येतं, कोणीच सांगितलं नाही की न बोलताच गिळलेले शब्द अनेक वर्ष मनात राहतात. सात वर्षं राहत नाही तर कधी कधी संपूर्ण आयुष्यभर राहतात. आणि ते झाडासारखे उगवत नाहीत ते तर मुळांसारखे आत खोलवर पसरत जातात.
आपण किती सहज शब्द गिळून टाकतो. “माझी चूक झाली” “मला तुझी आठवण येते” “मला भीती वाटते” “हे मला दुखावत आहे” “थोडा वेळ माझ्याजवळ बसशील?” “मी तुझ्यावर प्रेम करतो” अशी कितीतरी वाक्यं योग्य वेळेची वाट पाहत राहतात. मग तो योग्य वेळ कधीच येत नाही. आपण स्वतःची समजूत घालतो आज नको, उद्या बोलू, आत्ता शांत राहिलेलंच बरं, वेळ गेल्यावर याला काही अर्थ उरणार नाही.
पण वेळ निघून जातो, ते शब्द नाही.
उच्चारलेले शब्द हवेत विरून जातात. न बोललेले शब्द मात्र मनात घर करतात. सुरुवातीला ते फक्त एक विचार असतात. मग ते आठवण बनतात. नंतर पश्चात्ताप. आणि हळूहळू ते आपल्या स्वभावाचा एक भाग होऊन जातात. काही नाती तुटतात ती भांडणांमुळे नाही तर ती तुटतात कारण त्यांच्यामध्ये खूप काळ शांतता राहिली होती. काही प्रेमकथा संपतात त्या नकारामुळे नाही, त्या सुरूच होत नाहीत कारण कुणीतरी एका क्षणी धाडस करून ते एक वाक्य बोललं नाही.
आपल्या आयुष्यातील अनेक शोकांतिका मोठ्या घटनांमुळे घडत नाहीत. त्या कित्येक एका साध्या वाक्याच्या अनुपस्थितीमुळे घडतात.
माणसाला बोलण्याची भाषा लाभली, पण शांत राहण्याची सवयही लाभली. कधी अहंकारामुळे, कधी भीतीमुळे, कधी समोरच्याला गमावण्याच्या शक्यतेमुळे, तर कधी स्वतःलाच समजून न आल्यामुळे आपण शब्दांना ओठांपर्यंत येऊ देत नाही. त्या क्षणी आपल्याला वाटतं, आपण एक प्रसंग टाळला. पण प्रत्यक्षात आपण तो प्रसंग आपल्या आत कायमचा साठवून ठेवलेला असतो.
खलील जिब्रान The Prophet मध्ये लिहितो,
“You talk when you cease to be at peace with your thoughts.”
किती विलक्षण निरीक्षण आहे हे. आपण बोलतो ते फक्त दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी नसतं, आपण बोलतो कारण मनातला कोलाहल कधीतरी आवाज मागू लागतो. जेव्हा आपण त्या आवाजालाही गप्प बसायला शिकवतो, तेव्हा शांतता मिळत नाही, उलट मनाच्या एका कोपऱ्यात न संपणारा एक प्रतिध्वनी जन्माला येतो.
वय वाढतं तसं लक्षात येतं की आयुष्याची मोजदाद आपण केलेल्या गोष्टींनी जितकी होत नाही, तितकी ती न केलेल्या गोष्टींनी होते. न दिलेली कबुली, न मागितलेली क्षमा, न व्यक्त केलेलं प्रेम, न उच्चारलेलं सत्य आणि वेळ निघून गेल्यावर अर्थ हरवून बसलेली कितीतरी साधी वाक्यं, यांनीच कदाचित आपल्या मनातली सर्वात दाट जंगलं निर्माण केलेली असतात.
च्युइंगम कदाचित काही दिवसांत शरीरातून निघून जात असेल. कलिंगडाचं बी कधीच उगवत नसेल.
पण गिळलेले शब्द?
त्यांना कालमर्यादा नसते.
ते आपल्या आत मुळांसारखे परसतात… आणि मग आपण जगत राहतो ते त्यांच्या सावलीत.
— विश्वेश



छान!
मेरी बात रही मेरे मन में
कुछ कह न सकी उलझन में
खरंय... बरेच वेळा उगीचच संकोच करून आपण बोलायचे तेव्हा बोलत नाही आणि मग आयुष्य भर पश्चात्ताप... एकदा मी मुंबईत बांद्र्याच्या सिग्नलवर बाईकवर होतो. शेजारी गाडी येउन थांबली आणि असे ३ फुटावर होते पु. ल..... मी नुसताच वेड्यासारखा पहात राहिलो, कसनुसं हसलो, ते ही तसेच हसले आणि सिग्नल सुटला... 🙄😵💫