वाबी साबी
हल्ली एक गोष्ट वारंवार जाणवते. आपण वस्तू पूर्वीइतक्या वापरत नाही, त्या संपवण्याआधीच बदलून टाकतो. हल्ली वस्तू झिजत नाहीत तर त्या कालबाह्य होतात “outdated”. मोबाईलची बॅटरी थकण्यापूर्वी त्याचं नवीन मॉडेल बाजारात आलेलं असतं, चामड्याच्या बॅगेवर काळाच्या सुरकुत्या उमटण्यापूर्वी तिची फॅशन बदललेली असते, पेनाचे निब आपल्या हाताचा दाब ओळखू लागण्यापूर्वी आपण दुसरं पेन विकत घेतलेलं असतं. वस्तूंच्या आयुष्याचा शेवट आता त्यांच्या झिजेमुळे होत नाही, तो जाहिरातींमुळे होतो. बाजारपेठ त्यांना मृत घोषित करते आणि आपण त्या निर्णयावर निर्विकार सही करून पुढे निघून जातो. कधीकधी मला वाटतं, आता ह्या वस्तूंच्याही नशिबी माणसांसारखाच एकटेपणा आलेला असावा. आपण त्यांना घरी आणतो, पहिले काही दिवस त्यांचं कौतुक करतो, त्यांची काळजी घेतो. मग हळूहळू त्यांच्याकडे पाहणं कमी होतं, एक दिवस त्या कपाटात मागे सरकतात आणि काही दिवसांनंतर त्यांची जागा दुसरी वस्तू घेते. ज्या वस्तूला आपण एकेकाळी हौसेने निवडलं होतं तीच वस्तू नंतर आपल्या आयुष्यातून कुठलीही तक्रार न करता निघून जाते.
याच्या अगदी विरुद्ध एक सुंदर जपानी विचार आहे. एखाद्या गोष्टीच्या अनेक मध्यम प्रतीच्या आवृत्त्या जवळ ठेवण्यापेक्षा एकच उत्तम दर्जाची वस्तू निवडायची. ती इतकी काळजीपूर्वक निवडायची की पुन्हा दुसऱ्याचा विचारच मनात येऊ नये. एक चाकू, एक पेन, एक बॅग, एक चहाचा कप. आता हे सगळं वस्तू कमी असाव्यात म्हणून नव्हे, तर प्रत्येक वस्तूला आपल्या आयुष्यात पुरेसा वेळ देता यावा म्हणून. कारण एखादी कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्याचा भाग होण्यासाठी तिला वेळ लागतो. तिला रुजू दिलं पाहिजे, झिजू दिलं पाहिजे. तिच्यावर आपल्या हाताच्या सवयी उमटू दिल्या पाहिजेत. तेव्हा ती वस्तू निर्जीव राहत नाही तर ती आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनू लागते. मनुष्यातल्या नात्यांचा एक नियम वस्तूंनाही लागू होत असावा. कोणतीही गोष्ट पहिल्या भेटीत आपली होत नाही. एखाद्या माणसावर प्रेम जडायला जसा वेळ लागतो, तसाच वेळ एखाद्या वस्तूवरही विश्वास बसायला लागतो. आपला हात तिचा स्वभाव शिकतो, तिचं वजन आपल्याला पाठ होतं, ती कशी प्रतिसाद देते याची सवय मनाला लागते. मग एक दिवस ती वस्तू आपल्या आयुष्याचा एक सहज भाग बनते.
माझ्या टेबलावर काही पेनं आहेत. अनेकांना ती पेनं संग्रहाचा भाग वाटतात, मला मात्र पेन हे कधीच संग्रहातल्या वस्तू सारखे वाटले नाही. ते माझ्या आयुष्यातल्या सहप्रवासी आहे, प्रत्येक पेनाचा कागदावर लिहितांना येणारा आवाज वेगळा आहे. काही पेनं पहिल्याच शब्दापासून प्रवाही होतात तर काहींना दोन ओळी लिहिल्यावरच त्यांचा श्वास सापडतो. एखादे पेन गुळगुळीत कागदावर नृत्य करते, तर दुसऱ्याला खरखरीत कागदावरच त्याचं खरं रूप सापडतं. कोणत्या ऋतूत कोणती शाई त्याच्या स्वभावाला खुलवेल, कोणते पेन सकाळच्या शांततेत हातात घ्यावी आणि कोणते रात्री उशिरा, या सगळ्या गोष्टी कुठल्याही पुस्तकात लिहिलेल्या नसतात. त्या फक्त सहवासाने समजतात. वर्षानुवर्षे एकाच वस्तूबरोबर जगल्यावरच त्या उमगतात. लिहितांना मला अनेकदा असं वाटतं की मी पेन हातात घेत नाही, तेच मला हातात घेते. त्याची पकड शोधावी लागत नाही, त्याचं वजन मोजावं लागत नाही. माझ्या बोटांना त्याची सवय असते. जसं एखाद्या जुन्या मित्राला भेटल्यावर त्याच्याशी बोलण्यासाठी प्रस्तावना लागत नाही, अगदी तसं. ते पेन माझ्या विचारांच्या आड उभं राहत नाही, उलट तेच विचारांना कागदापर्यंत पोहोचवणारा मार्ग बनतं.
कदाचित म्हणूनच जगातल्या मोठ्या कारागिरांना त्यांच्या साधनांबद्दल इतका आदर असतो. एक सुतार त्याचा रंधा रोज स्वच्छ करतो, शल्यविशारद त्याची साधनं जपत असतो, तबलजी तबल्यावर हात ठेवण्याआधी त्याच्याशी संवाद साधतो. बाहेरून पाहणाऱ्याला ही केवळ सवय वाटू शकते पण प्रत्यक्षात ती साधनांची काळजी असते त्याहूनही पलीकडे तो स्वतःच्या कलेचा आदर असतो. कारण एखादं साधन जितकं तुमच्या हातात मुरत जातं तितकंच ते तुमच्या स्वभावातही उतरू लागतं.
अशाच काही वस्तूंमध्ये बाबांचं Titan कंपनीचं घड्याळ आहे. त्याची किंमत आज फारशी नाही. दुकानात गेलो तर त्यापेक्षा महागडी, अधिक देखणी आणि अधिक अचूक घड्याळं क्षणात मिळतील. पण ती घड्याळं वेळ दाखवतील, हे घड्याळ काळ दाखवतं. त्याच्या पट्ट्यावर बाबांच्या मनगटाची वळणं अजूनही दडलेली आहेत. काचेवरचे बारीक ओरखडे त्यांच्या आयुष्याच्या धावपळीचे उरलेले अवशेष आहेत. लेथ मशीन ते CNC वर काम करणारे ते हात, किती प्रवास, किती प्रतीक्षा, किती आनंदाचे दिवस आणि किती चिंतेच्या रात्री त्या काट्यांनी पाहिल्या असतील याचा विचार करत बसलो की ते घड्याळ अचानक एक वस्तू राहत नाही. त्यात एक माणूस राहायला लागतो. आज ते घड्याळ हातात घेतलं की मला वेळ किती हे जाणवत नाही, मला वेळ निघून गेली आहे हे जाणवतं. एका क्षणासाठी मी ते घड्याळ घालतोही मी माझ्या हातांवर पण तेव्हा मनगटावर घड्याळ नसतं, बाबांचा हात असतो. त्यांच्या उपस्थितीची एक हलकी जाणीव असते. त्या स्पर्शात एक संपूर्ण आयुष्य दडलेलं असतं.
बहुतेक प्रत्येक घरात अशा काही वस्तू असतात. आईची पितळी ताटली, आजोबांचा चष्मा, एखादी जुनी पेटी, पहिला कॅमेरा, पहिली वही, पहिल्या पगारात घेतलेलं घड्याळ. त्या वस्तूंची किंमत त्यांच्या धातूत किंवा लाकडात नसते. त्या आपल्या आठवणींच्या पटावरचं एक पात्र बनलेल्या असतात. काळाने त्यांच्यात स्वतःचं प्रतिबिंब ठेवलेलं असतं. म्हणूनच त्या झिजतात तेव्हा आपल्याला त्या कुरूप वाटत नाहीत, उलट त्या अधिक सुंदर वाटू लागतात. कारण झीज ही वस्तूची हानी नसते. झीज म्हणजे त्या वस्तूने जगलेल्या आयुष्याची ग्वाही असते. जपानी लोक *वाबी साबी*बद्दल बोलतात. अपूर्णतेतलं सौंदर्य. झिजेमधलं सौंदर्य. काळाच्या स्पर्शातलं सौंदर्य. मला वाटतं त्यामागे फक्त सौंदर्यशास्त्र नाही, त्यामागे स्मृतींचं तत्त्वज्ञान आहे. जे अजून झिजलेलं नाही ते अजून जगलेलंही नाही. पूर्णपणे नवीन वस्तू सुंदर दिसू शकते, पण अनेक वर्षे आपल्याबरोबर चाललेली वस्तू अर्थपूर्ण दिसते. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.
आज आपण फक्त वस्तू बदलत नाही. आपण सवयी बदलतो, शहरे बदलतो, नोकऱ्या बदलतो, माणसं बदलतो, विचार बदलतो. बदल हा जीवनाचा नियम आहे हे खरं, पण प्रत्येक बदल समृद्धी देतोच असं नाही. काही गोष्टी बदलल्या म्हणून आपण पुढे जातो तर काही गोष्टी न बदलल्यामुळे आपण अधिक खोल जातो. आपल्या आयुष्यात, मनात एखादं पुस्तक दशकानुदशकं घर करून राहणं, एखाद पेनं वर्षानुवर्षे आपल्या टेबलावर असणं, एखादं घड्याळ एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणं, ही केवळ सातत्याची उदाहरणं नाहीत. ती स्मृतीची परंपरा आहे. बहुधा म्हणूनच आयुष्याच्या उत्तरार्धात माणूस नवीन वस्तू विकत घेणं कमी करतो. तो जुन्याच वस्तू लख्ख घासून पुसून, त्यांना स्वच्छ करतो. त्यांच्यावरच्या असंख्य ओरखड्यांकडे प्रेमाने पाहतो. त्या झिजू नयेत म्हणून नव्हे तर त्या तश्याच झिजलेल्या राहाव्यात म्हणून.
माणसांच्या नात्यांप्रमाणेच वस्तूंच्याही नात्यांना एक आयुष्य असतं, फरक एवढाच असतो की माणसं निरोप देऊन जातात, वस्तू मात्र मागे राहतात. निवांत वेळ असला की एखाद्या शांत दुपारी आपण त्यांना हातात घेतो, घरात कोणीच बोलत नसतं, शांतता असते आणि त्या वस्तू आपल्याशी बोलू लागतात. त्या आवाजाला शब्द नसतात, त्या संवादाला भाषा नसते, पण त्या शांततेत आपल्याला एक गोष्ट अगदी स्पष्ट ऐकू येते, आपण ज्यांना इतकी वर्षे वस्तू म्हणून जपत होतो त्या पुढं जाऊन आपल्या आठवणी जपणार आहेत, पुढच्या पिढीला आपली आठवण करून देणार आहेत, आपण हे नश्वर आयुष्य संपले की कदाचित अश्याच काही वस्तूंमध्ये जाऊन राहणार आहोत ...
-- विश्वेश


